परीक्षेला पर्याय काय?
प्रत्येकाचं वर्षाचं कॅलेंडर दिवस सारखेच असले, तरी वेगळंच असतं. आम्हा शिक्षकी पेशातल्या लोकांचं तर total वेगळंच म्हणा ना! आम्ही निकाल- प्रवेश - परीक्षा आणि पुन्हा निकाल हे चार हंगाम जगणारी माणसं आहोत. या मुख्य गोष्टी सांभाळत आम्ही शिकवत असतो. एक पाठ्यपुस्तक, प्रत्येक धड्याला इतक्या तासिका, इतक्या तासिकांत एवढं शिकवून झालं पाहिजे असं टार्गेट, जोडीला क्लास टेस्ट मग सहामाही वार्षिक हेच आमचं life आहे. क्रमिक पुस्तक ही एवढी बुलंद चौकट असते, की ती तोडून शक्यतो बाहेर पडताच येत नाही. अर्थात काही याला अपवाद आहेत. पण बहुतेक सगळेच विद्यार्थी - पालक आणि शिक्षक पुस्तकांना आणि परीक्षेला त्याच्या निकालाला शरण गेलेले असतात. कधी कधी प्रश्न पडतो, की याचं फलित काय? आपण हे मुलांना शिकवतो ते त्यांना कळलं किती ते जाणून घेण्यासाठी परीक्षा घेतो की त्यांची नेमाने परीक्षा घेता यावी म्हणून त्यांना शिकवतो आहोत? खरं मान्य करायची तयारी असेल, तर या प्रश्नाचं नेमकं उत्तर सांगता यायचं नाही. मला गेल्या दीड वर्षात आलेला अनुभव असा, की जी कुठेही चमकतीलच अशी मुलं चटकन लक्षात येतात. ती वर्गातही पुढे असतात, परीक्षेतही पुढे अस...